संगमेश्वरच्या सांस्कृतिक सक्षमीकरणातले अनोखे रत्न ” अर्चिता कोकाटे ”
नवरात्र उत्सव पर्वावर विशेष लेख...

दैनिक झुंजार टाईम्स
दिनेश आंब्रे:- संगमेश्वर प्रतिनिधी
दिनांक:- २०-०९-२०२५
कोकण:- कोकणामध्ये नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आदीमाया, आदिशक्ती, दुर्गा माता, तुळजाभवानी, आई महालक्ष्मी, महाकाली अशा विविध देवतांचे पूजन अत्यंत संस्कृती पूर्ण पद्धतीने व भक्तिभावाने भक्तजन महिला करतात. या आदिशक्तीच्या स्फूर्तीने ऊर्जा घेऊन काही महिला समाजातील विविध प्रकारे सत्कार्य करताना दिसतात व आपल्याबरोबरच दुसऱ्यांच्याही जीवनाला विविध कला गुणांनी शृंगारित करत असतात.

अशाच संगमेश्वर बाजारपेठेतील पाग आळी नावडी भागातील प्रतिष्ठित व्यापारी राहुल जयप्रकाश कोकाटे यांच्या सुविद्य व सुलक्षणी पत्नी संस्कृती रत्न अर्चिता राहुल कोकाटे पूर्वाश्रमीची संगमेश्वर येथील सुप्रसिद्ध व्यापारी अनिल गजानन शेट्ये व आई अर्चना अनिल शेट्ये यांची सुकन्या अमृता अनिल शेट्ये. आई-वडिलांचे संस्कार तसेच माध्यमिक शालेय जीवन पैसा फंड हायस्कूल मध्ये पूर्ण करून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हापासूनच कॅरम या राज्य खेळाची आवड निर्माण झाली व जिल्हा स्तरापासून राज्यस्तरापर्यंत स्पर्धात्मक जीवनातून अनेक पारितोषकांची कमाई केली.
सन 2006 रोजी विवाह झाल्यानंतर सासुबाई श्रीमती जयमाला जयप्रकाश कोकाटे या प्रियदर्शनी महिला मंडळ यामध्ये फाउंडर मेंबर तसेच सांस्कृतिक जीवनात पहिल्यापासूनच असल्यामुळे त्यांचा पावलावर पाऊल ठेवून कोकणची तसेच आपल्या संगमेश्वर बंदरातील संस्कृती व परंपरा तसेच चालीरीती जपणे व सांस्कृतिक संपदा जपून ठेवणे अशी मनीषा उरी बाळगून आपला परिवार व शिक्षकी पेशा सांभाळून जिद्द व चिकाटीने विविध कार्यक्रमात व शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थेच्या उपक्रमात व कार्यात सहभाग घेत पुढे जाता आले.

उंबरठ्याच्या आत राहणाऱ्या गावातील महिला यांचे संघटन करून एक मनाने व कोकणची संस्कृती व कलापरंपरा जपण्याच्या एक विचाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांना सहभागी करून त्यांच्या अंगीभुत असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यात मोलाचा वाटा आहे.
कलाकार महिलाही भजन, मंगळागौर, दांडिया नृत्य, ढोल पथक, शोभायात्रा इत्यादी आनंदाने व उत्स्फूर्तपणे सहभागी होताना सध्या दिसत आहेत. हे श्रेय अर्चिता यांना जाते.
जीवन वेलीवर सुकन्या
” आर्या ” ही देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना संजीवनी देत आहे. यांनी आपल्या जीवन प्रवासात या कलागुणांबरोबरच पत्रकारिता, दहीहंडी, पोलीस दक्षता व सुरक्षा कमिटी, कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून केलेले काम इत्यादी गोष्टी देखील जपले आहे.
गेली तीन वर्ष होणाऱ्या सांस्कृतिक लोकनृत्य स्पर्धा मंगळागौर स्पर्धा या कार्यक्रमांमध्ये महिलांना एकत्रित करून भाग घेऊन प्रथम क्रमांकाची बक्षिसे प्राप्त केलेली आहेत.
पती राहुल जयप्रकाश कोकाटे यांचा सहृदय पूर्ण पाठिंबा म्हणूनच हे शक्य. सध्या गाव ते मुंबई असा सांस्कृतिक कार्याचा महत्त्वपूर्ण जीवन प्रवासाचा टप्पा गाठता आला आहे.
सद्गुरु माता ” कलावती आई ” यांच्यामुळे अनेक वेळा यशाची शिखरे पादाक्रांत करता आली. त्यांचे आशीर्वाद तसेच आई-वडील गुरुजन मार्गदर्शक व परिवाराचा आशीर्वाद असल्यामुळे लक्ष गाठण्याचा प्रयास करत आहे.
८ मार्च 2025 रोजी कवी सिताराम सुत म्हणजेच कवी सूत बेलवलकर सांगली यांनी स्वतःच्या काव्य शब्दांमध्ये अर्चिता यांना सन्मानित केलेले आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासामध्ये योगदान दिल्याबद्दल सन 2024 मध्ये विश्व समता कला मंच लोवले यांच्याकडून
” विश्व समता प्रज्ञा गौरव पत्रे” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक क्षेत्रात आणि महिला सक्षमी करणामध्ये केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सन 2023 – 24 मध्ये ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ” पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व समता कला मंच यांच्यातर्फे सन 2019 मध्ये ” राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार ” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
कोविड काळात जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त व्यक्तींना केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस तपास महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ” कोरोना योद्धा ” सन्मानपत्र तसेच महालक्ष्मी टाइम्स कोल्हापूर यांच्याकडून
” कोरोना योद्धा ” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे.
या सर्व कार्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की जोपर्यंत आपल्याला जेवढं समाजासाठी काही चांगलं करता येईल ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रामाणिकपणे आणि विश्वासपूर्वक पुढेही करणार आणि महिला सक्षमीकरणासाठी जी धडाडीची पावले उचलता येतील ती सक्षमपणे एकत्रित पुढे घेऊन जाणार.





